Showing posts with label मराठी भाषणे. Show all posts
Showing posts with label मराठी भाषणे. Show all posts

August 17, 2024

रक्षाबंधन मराठी निबंध



रक्षाबंधन 

नारळी पौर्णिमा या सणांची माहिती


सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती,

ओवाळिते भाऊराया,

वेड्या बहिणीची वेडी रे माया।

       या गाण्याच्या ओळी आठवण करून देतात भाऊबीजेची. मला या सणासारखाच वाटणारा, आवडणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा. भावा- बहिणीचे नाते दृढ करणारा हा सण. राखी पौर्णिमेला मला आठवते, ती राणी कर्मावतीची गोष्ट. राणी कर्मावती ही एक रजपूत स्त्री. पण तिने मुघल सम्राट हुमायूनला राखी पाठवली. या एका धाग्याने सारा इतिहासच बदलला. मुघल सम्राटाने राणी कर्मावतीची राखी स्वीकारली; आणि तिने जोडलेले भावाचे नातेदेखील निभावले. आपापसातील वैर, भांडण मिटवून प्रेमाचे, आपुलकीचे नाते जोडले. या गोष्टीवरून राखीचे महत्त्व लक्षात येते की नाही ? या सणाच्या निमित्ताने बंधुभाव निर्माण करता येतो. भावाने बहिणीचे रक्षण करणे, हे त्याचे कर्तव्य असते नि त्या कर्तव्याची भावना राखीच्या धाग्याने दृढ होते.

पूर्वी हळदीमध्ये भिजवलेल्या सुती दोऱ्यात मोहरी व सोने बांधून राखी तयार केली जात असे. या राखी बांधण्यामागे हेतू होता, भावाचे अशुभापासून रक्षण व्हावे व भावाने बहिणीचे तिच्या संकटकाळी रक्षण करावे. असा दुहेरी बंधन असलेला हा सण पूर्वापार साजरा होत आहे.

आज बाजारात विविध कलाकुसरीच्या राख्या पाहायला मिळतात. राख्यांचे स्वरूप अधिकाधिक कलात्मक होत असले, तरी त्यामागील हेतू, भावना मात्र तीच आहे. भावा-बहिणीच्या निःस्वार्थ प्रेमाचे नाते सांगणारा हा सण आहे. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो.


 नारळी पौर्णिमा


          याच दिवशी येणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. हा सण म्हणजे खास कोळी लोकांचा, खलाशांचा. यांचे जीवन समुद्राशी निगडित असते. आषाढात समुद्र खवळतो, वादळ होण्याची शक्यता असते; त्यामुळे समुद्रातून होणारा व्यापार, होणारा प्रवास मंदावतो. पुन्हा श्रावणापासून हे व्यवहार सुरू होतात. पण त्यापूर्वी खवळलेल्या समुद्राला शांत करून त्याची पूजा करतात. त्या समुद्राविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याला सोन्याचा नारळ अर्पण केला जातो.

          समुद्रकिनारी वाढणारी झाडे म्हणजे नारळाची झाडे. ह्या नारळाचे फळ म्हणजे श्रीफळ. ह्यांला हिंदूंनी पवित्र मानले आहे. म्हणून कोणत्याही शुभ कार्यात श्रीफळाला मानाचे स्थान दिले जाते. कोणाचाही आदर- सत्कार करताना आपण त्याला श्रीफल देतो ना, तसेच हे कोळी लोक समुद्राला श्रीफळ अर्पण करून त्याचा आदर-सत्कार करतात.

           या सणाचे पक्वान्न म्हणजे नारळी भात. अशा त-हेने हे दोन्ही सण आपल्याला बरेच काही शिकवतात.







November 14, 2022

जननायक बिरसा मुंडा






 नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, आज आपण जननायक बिरसा मुंडा यांची माहिती पाहणार आहोत.

बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी सुगाना व करमी या आदिवासी दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे जन्मगाव उलिहातू हे रांचीजवळ आहे.


बिरसाचे आई-वडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले. तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता.


तो काळ पारतंत्र्याचा होता. संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतून वाचले नव्हते. इंग्रजांनी वन-कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता. त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांच्या


विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. १८९४ साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला. उपासमार व रोगराईत अनेक लोक मरण पावले.


तशातच ब्रिटिशांनी जमीनदार व जहागीरदारांकरवी शेतकऱ्यांवर अवाजवी शेतसारा लावला होता. याविरुद्ध बिरसाने वेळोवेळी जनआंदोलन केले. यामुळे संतप्त होऊन इंग्रज सरकारने १८९५ मध्ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. त्यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले. याच तुरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला आणि आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध उलगुलान पुकारला. 'उलगुलान' म्हणजे एकाचवेळी सर्वांगीण उठाव.


१८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्रांद्वारे अनेक लढाया केल्या. ब्रिटिशांना जेरीस आणले; परंतु ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रांपुढे व मोठ्या सैन्यबळापुढे आदिवासी क्रांतिकारकांचा टिकाव लागू शकला नाही.


१८९८ मध्ये एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे ४०० आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले. आपल्या २५ वर्षांच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे हे ओळखले. त्याविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित केले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले. त्याचबरोबर आदिवासींचे आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदार व जहागीरदार यांच्या विरोधातही बंड पुकारले. त्यामुळेच आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.

सन १९०० मध्ये बिरसा मुंडा पहाडांमध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याने अचानक हल्ला चढवला. त्या ठिकाणी भीषण लढाई झाली. बिरसा मुंडांना चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. तुरुंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यामुळे ९ जून १९०० रोजी त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले.


या वीराने आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी मोठा लढा दिला. त्यामुळे लोकांनी त्यांना 'जननायक' हा किताब बहाल केला.

October 24, 2022

माझा आवडता संत - संत ज्ञानेश्वर MAJHA AAVDTA SANT SANT DNYANESHWAR






 माझा आवडता संत 

  संत ज्ञानेश्वर 

शक्तीच्या ऐलतीरावर भक्तीच्या पैलतीरावर पहुडलेल्या महाराष्ट्राला मानवतेच्या दिव्य प्रकाशाने तेजोमय करण्याचं काम एका तेजस्वी ज्ञानसूर्यानं केलं,हा ज्ञानसूर्य म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर होय.ज्ञानदेवांच्या जन्मापूर्वी इथला भक्तीचा मार्ग फक्त उच्चवर्णीयांच्याच दरावरून जाट होता.तोच भक्तीचा मार्ग अधिक सोपा करून बहुजनांच्या घरापर्यंत नेण्याचे काम ज्ञानदेवांनी केले.वडील विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांनी प्रायश्चित म्हणून स्वतःचं आयुष्य संपवल्यावरही ,आळंदीकरांनी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा छळ थांबवला नाही.ज्या माणसांनी अनाथ ज्ञानदेवांच्या झोळीत 'भिक्षा'ही घातली नाही त्या माणसांच्या अज्ञानी झोळीत ज्ञानाचं भांडार ओतण्याचं काम ज्ञानदेवांनी केलं.

 वर्णभेदाच्या आणि जातिभेदाच्या सीमारेषांमध्ये बंदिस्त असलेला तत्कालीन समाज मानवता विसरून गेला होता. अत्मोद्धाराचे सामर्थ्य असलेली ईश्वरभक्ती कर्मकांडाच्या चौकटीत बंदिस्त होती.अशा वेळी ज्ञानेश्वरांनी प्रवाहविरोधी भूमिका स्वीकारून महाराष्ट्राच्या मातीवर परिवर्तनाची पताका उभी केली.योग,कर्मकांड,दांभिकता यांसारख्या सामान्य माणसांना अशक्य असणाऱ्या गोष्टी नाकारून सर्वसामान्य माणसांसाठी 'हरिपाठाच्या'माध्यमातून नामसंकीर्तनाचा सोपा मार्ग सांगितला.

बरे केले ज्ञानदेवा,सांगितला हरिपाठ ।

आम्हा साध्या माणसांना ,सोपा केला परिपाठ ।।

उच्चवर्णियांच्या गुलाबी ओठांवर खेळणाऱ्या 'संस्कृत' भाषेत ज्ञानाचे भंडार बंदिस्त होते.हे ज्ञान सर्वसामान्य  माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी ,सर्व सामन्यांच्या गळी उतरवण्यासाठी ज्ञानदेवांनी 'ज्ञानेश्वरी' लिहिली.

" माझ्या आईच्या भाषेत,आहे ग्रंथ 'ज्ञानदेवी'

सांगे जीवनाचे सार ,तिची एक-एक ओवी."

सोपी भाषा,साधी उदाहरणे आणि दैनंदिन जीवनातील दाखले या साहित्य वैशिष्ट्यांचा विचार केला तर संत ज्ञानदेव फक्त 'संत'च नाही तर महान प्रतिभावंत वाटतात.

आजच्या पुरोगामी महाराष्ट्राची बीजे सातशे वर्षांपूर्वीच्या ज्ञानदेवांच्या विचारात आढळतात."

पेरुनी नुसतीच हिंसा,उगवेल कशी अहिंसा.'

या भाषेत ज्ञानदेवांनी यज्ञात बळी देण्याच्या प्रथेला ,हिंसेला विरोध केला.

" योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी l वायाचि उपाधी दंभ धर्म अशा कर्मकांडाला ज्ञानदेवांनी विरोध केला.

सातशे वर्षांपूर्वी सर्व जातीधर्मातील संतांना एकत्र करून 'वारकरी संप्रदायाच्या' रूपाने त्यांच्या हातामध्ये ज्ञानदेवांनी समतेची पताका दिली.आजही ती पताका खांद्यावर घेऊन वारकरी सांप्रदाय साऱ्या देशाला शांतीचा व समतेचा संदेश देत पंढरीची वाट चालतो आहे. 

आजच्या भंगलेल्या समाजव्यवस्थेमध्ये ,दुभंगलेल्या मनांना जोडण्याचे सामर्थ्य ज्ञानोबांच्या अभंगांमध्ये आहे.आजही सारा महाराष्ट्र ज्ञानोबांना डोक्यावर घेऊन नाचतो आहे.खरं तर ; ज्ञानोबांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेणे गरजेचे आहे.त्यांच्या नावाचा नुसता गजर करण्याऐवजी त्यांच्या विचारांचा जागर होणे आवश्यक आहे.

ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलाविले की नाही याला पुरावा नाही पण रेड्याप्रमाणे स्थूल झालेल्या सामान्य माणसांना बोलते करण्याचं काम ज्ञानदेवांनी केलं हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही.ज्ञानदेवांनी दगडी भिंत चालवली की नाही ,हे निश्चित माहित नाही ,परंतु वर्णभेदाच्या चौकटीत भिताड झालेल्या माणसांना चालतं-बोलतं करण्याचं काम ज्ञानदेवांनी केलं हे नाकारता येणार नाही अशा या ज्ञानाच्या महासागराबद्दल बोलताना आपोआपच आपल्यासारख्यांना मर्यादा येतात आणि शब्द तुकोबांच्या शब्दांचा आधार घेतात.....

" ज्ञानियांचा राजा गृरू महाराव ,

म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे,

मज पामरा हे काय थोरपण ,

पायाची वहान पाया बरी ।।